निवडणुका महायुती म्हणूनच लढणार   

देवेंद्र फडणवीस यांचे संकेत; अपवादात्मक स्थितीत स्वबळावर

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे. जेथे मित्रपक्षला जागा सोडता येणार नाहीत, अशा ठिकाणी आम्ही वेगळे लढू. निवडणुकानंतर पुन्हा एकत्रित येवू. निवडणुका या महायुतीमध्येच लढायच्या आहेत.  या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगळे लढणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट करीत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
यशदा येथे राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेस फडणवीस यांनी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १२० दिवसांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात अडचण वाटत नाही. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. 
 
ज्या भागात पाऊस अधिक असेल त्या भागातील निवडणुका थोड्या पुढे ढकलण्याची विनंती आम्ही आयोगाला करू; पण वेळेत निवडणुका पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार, की महायुतीच्या माध्यमातून? या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्हाला महापालिकांच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिन्ही पक्ष एकच आहोत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ते पाच पाच, सात सात वर्ष काम करतात, त्यांना निवडणूक लाढवावी, असे वाटणे सहाजिकच आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला  अधिक जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येवू. अपवादात्मक ठिकाणी जेथे स्वतंत्र निवडणूक लढू, तेथे एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू. मात्र, जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
 
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आम्ही प्रशासकीय सुधार, ई-गर्व्हवन्सचा वापर आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी संवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध गट तयार करून एका एका गटासोबत मी चर्चा करत आहे. त्यांच्या अडचणी काय आहेत. आमच्या अपेक्षा काय आहेत, यावर नवीन काय करता येईल, याचा एकत्रित विचार करत आहोत. यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. अनेक जण चांगले काम करत आहेत. ते जोपर्यंत पदावर असतात, तोवर ते काम राहते, ते बदलल्यानंतर व नवीन कोणी आल्यावर त्यात बदल होतोे. ते टाळण्यासाठी संस्थात्मक बांधणी करायची आहे, त्यासाठी या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. यानंतरही कार्यशाळा होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
 
तुर्कीवर बहिष्कार टाकणार्‍या व्यापार्‍यांचे अभिनंदन
 
तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकणार्‍या व्यापार्‍यांचे मी अभिनंदन करतो. पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्भवस्त करणारा आमचा भारत आहे. ते भारताला नखही लावू शकले नाहीत. त्यामुळे व्यापार्‍यांनी कोणाच्या धमकीला भिक घालू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. नाशिकमधील रॅलीमध्ये ज्यांनी लॉरेन्स बिष्णोईचे पोस्टर दाखवले त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याबाबत मी आमदार गोपीचंद पडळकर यांना तक्रार करायला सांगितली आहे.
 
न्यायालयाच्या निर्णयानुसारच प्रभाग रचना
 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच प्रभाग रचना महापालिकांच्या निवडणुकीसाठी राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाचे काम सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२ नुसारच प्रभाग रचना असेल. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकी महायुतीच्या माध्यमातून लढलो. आता येणार्‍या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात (डिपी) काही त्रुटी होत्या, त्यावर अक्षेप आले होते. या त्रुटी दूर करून नवीन डीपीमध्ये सर्वसामान्यांचे हित जपले जाईल, नियोजित शहर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही शिंदे म्हणाले.

Related Articles